माहीत नव्हतं कशी असशील?,
कशी दिसशील?,
कशी रहाशील?,
कशी माणसं जपशील?
पण तू आलीस आणि
दुधात साखरेनं विरघळावं तसं विरघळलीस
अमृत झालीस,
सगळे सण वार, व्रतं वैकल्य
अगदी आनंदानं उत्सहानं पार पाडलीस
उदबत्तीच्या मंद सुवासात साडी घालून पूजा करताना तुला पाहिलं
की मी माझा सगळा ताण विसरून जायचो
बायको पेक्षा जास्त मैत्रीण झालीस
सुखात माझ्या बरोबर,
आणि दुःखात माझ्या मागे आधार म्हणून उभी राहिलीस
घरातल्या प्रत्येकाची मनं जिंकलीस
माझं मन तर केंव्हाच तुझं झालं होतं
तुझ्या झऱ्यासारख्या खळखळणाऱ्या हसण्यावर,
तुझ्या रम्य अशा डोळ्यांवर,
तुझ्या गुलाबी ओठांवर,
तुझ्या गालांवर,
रेशमी वस्त्रालाही असूया व्हावी अशा मऊ केसांवर,
आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुझ्या निर्मळ आणि स्वच्छ मनावर
मी प्रेम केलं आणि करत राहील आयुष्याच्या संध्याकाळपर्यंत
आणि तेंव्हाही तू मला तशीच दिसशील,
जशी आपल्या पहिल्या भेटीत दिसली होतीस तशी.
- कौस्तुभ एकबोटे